चला! जयहिंद मध्ये सामील होऊ या!

जयहिंद चळवळ केवळ एक सामाजिक संस्था नसून समाजातील सर्व घटकांच्या व सर्व वयोगटाच्या स्त्री- पुरुषांनी एकत्र येत निर्माण केलेली सुदृढ समाजाच्या निर्मितीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा ध्यास घेतलेली लोकचळवळ आहे.जगात महासत्ता बनण्याचे स्वप्न सर्व भारतीयांचे आहे परंतु सुदृढ समाजाची निर्मिती केल्याशिवाय आपण हे स्वप्न कधीही पूर्ण करू शकणार नाही.स्वातंत्र्यानंतर भारताने अनेक क्षेत्रात मोठी प्रगती केलेली आहे हे कोणीही नाकारु शकत नाही तथापि एक बलशाली राष्ट्राचे उद्दिष्ट अजून खूप दूर आहे.भारत आजही विकसित राष्ट्र (Developed Nation) नसून विकसनशील राष्ट्र (Developing Nation) आहे.

गरिबी, शिक्षण, आरोग्य, आनंदी समाज या अनेक मानव विकास निर्देशांकात (Human Development Index) आम्ही प्रगत राष्ट्राच्या तुलनेत खूप मागे आहोत ही बाब आम्हाला खचितच अभिमानास्पद नाही. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षात आपण एकसंघ राष्ट्र निर्माण करु शकलो नाही.प्रांत,भाषा, जात, धर्म यातील मतभेदांमुळे वरून एक असलो तरी आतून दुभंगत चाललेली आहे. गेल्या काही वर्षात ही स्थिंती चिंताजनक रीत्या बिघडत चाललेली आहे अंधश्रद्धा, दैववाद, जातीयता, धर्मांधता, भ्रष्टाचार व राजकारणातील अनैतिकता यांनी गंभीर रूप धारण केलेले आहे. हे सर्व भ्रष्ट, स्वार्थी व पोकळ नेत्यांमुळे होत आहे.जयहिंद लोकचळवळ हे दृढपणे मानत आहे की आपले नागरिक शांतता प्रिय, सहिष्णू ,समजूतदार आहेत मात्र मुठभर शक्ती वाईट हेतूंनी प्रक्षोभक व खोटा अपप्रचार करून समाजाचे स्वास्थ बिघडवित आहे. लोकशाहीची व राज्यघटनेची राजरोस पायमल्ली होत आहे या स्थितीत आपण सर्व सुबुद्ध नागरिक एकत्र येऊन ही स्थिती बदलू शकतो. एक सुदृढ समाजव्यवस्था म्हणजे बंधुभाव, समता, लोकशाही मूल्यांचे रक्षण तसेच सर्वांसाठी जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था, आरोग्य सर्वांना रोजगार, महिलांना सुरक्षित व समान संधी व स्थान, युवकांच्या स्वप्नपूर्तीसाठी सुयोग्य वातावरण निर्माण करू शकतो यासाठी आपण विशेषत: युवक- युवतींनी पुढे आले पाहिजे.विद्यमान राजकीय नेते हे करु शकणार नाही.युवकांनी सर्व क्षेत्रात नेतृत्व केले पाहिजे यासाठी जयहिंद लोकचळवळ आपणास आवाज देत आहे.

मित्रांनो आपण सर्व मिळून हे निश्चितच करू शकतो कारण आपल्या देशात प्रचंड क्षमता आहे.भारतीय नागरिक बुद्धिमान आहे.प्रचंड कष्ट घेण्याची तयारी आमची आहे. जगाच्या व्यासपीठावर भारताच्या युवक - युवती, उद्योजकांनी, अंतराळ क्षेत्रातील शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले आहे आपण वैज्ञानिक दृष्टी व मानवतावादी उदार विचारसरणीतूनच जगात सर्वश्रेष्ठ होऊ शकतो. संकुचित विचार इतिहासातील संदिग्ध विषय व घटना उकरून काढून देशात सदैव संभ्रमाचे व अशांततेचे वातावरण केल्याने व नागरिकांत फूट पाडल्याने कुठलाही समाज वा कुठलेही राष्ट्र प्रगत होऊ शकत नाही. हे वैश्विक सत्य आहे!

चला तर भारताला बलशाली, प्रगत, सर्वांना न्याय देणारे आनंदी राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जयहिंद लोकचळवळीत सामील होऊ या !


डॉ.सुधीर तांबे (संस्थापक, जयहिंद लोकचळवळ, महाराष्ट्र)

सुदृढ व चांगल्या समाजाचे मापदंड

सशक्त व निकोप लोकशाही
या देशातील सामान्यांच्या जीवनात गेल्या 75 वर्षात जे बदल झाले ते महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांतून आलेल्या लोकशाहीमुळे! स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये म्हणजे लोकशाही! एकाधिकारशाही, हुकूमशाही व्यवस्थांमध्ये सामान्य नागरिकांवर प्रचंड अत्याचार होत असतात हे जगाने अनेकदा अनुभवले आहे!
शिक्षण
सर्वसामान्य, गोरगरीब मुलांच्या दर्जेदार शिक्षणासाठी शासनाशी संघर्ष करण्याबरोबरच शासनाला समांतर सामाजिक चळवळ निर्माण करुन या शाळांमधील विद्यार्थ्यांना संगणक, इंग्रजी, गणित व शास्त्र यांचे उत्तम ज्ञान देण्यासाठी जयहिंद प्रयन करीत आहे!
आरोग्य
प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत शासन आरोग्यावर खूपच कमी खर्च करत आहे. याविषयी योग्य ध्येय धोरण आखण्यासाठी शासनावर दबाव निर्माण केला पाहिजे. त्याचबरोबर जयहिंद आरोग्य चळवळीद्वारे "Catch them Young" अंतर्गत शाळकरी मुलांमधील घातक आजार व व्यसनाधीनतेबद्दल प्रशिक्षण देऊन जागृती निर्माण करण्यात येईल.
आर्थिक सक्षमता व बेरोजगारी निर्मूलन
बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनास योग्य औद्योगिक घोरणे निर्माण करण्यास चळवळीद्वारे भाग पाडणे, युवकांना व्यवसाय मार्गदर्शन व प्रशिक्षण जयहिंद लोकचळवळीद्वारे चालू आहे! युवकांमध्ये आर्थिक साक्षरता, उद्यमशीलता निर्माण करण्यासाठी परिसंवाद प्रशिक्षण, इंक्‍युबेशन सेंटर सुरु करणे असे प्रयन सुरु आहेत.
कृषी
शेतीला उर्जितावस्था मिळवून देण्यासाठी शेतीला उद्योगाचे स्वरूप देणे व शेतीचा खर्च कमी करुन उत्पन्न वाढविणे, तसेच एकात्मिक शेतीद्वारे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देण्यासाठी जयहिंद कृषी मंचद्वारे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच युवा शेतकऱ्यांना संघटित करून या प्रयत्नांना चळवळीचे स्वरुप देण्यात येणार आहे.
पर्यावरण संवर्धन
स्व.भाऊसाहेब थोरात यांनी अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धनसाठी सुरु केलेली चळवळ सातत्याने कार्यरत आहे. दंडकारण्य अभियान, वृक्षारोपण, वृक्षसंगोपन व स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून जयहिंद सातत्याने पर्यावरण संवर्धन व लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याचे काम करत आहे.
क्रीडा क्षेत्र
जयहिंद लोकचळवळ ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवतींमधील विविध क्रीडा प्रकारातील नैपुण्य लक्षात घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करते. तसेच प्रत्येक खेड्यात उत्तम क्रीडांगण व व्यायामाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी सहकार्य करते.
कला व सांस्कृतिक
जयहिंद जागर मंच कलाक्षेत्रात तसेच नाट्य क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत आहे. भविष्य काळात या क्षेत्रात अधिक कार्य करण्याचा जयहिंदचा मानस आहे.
महिलांचे सक्षमीकरण
महिलांना संघटित करुन त्यांना स्व-संरक्षणासाठी सक्षम बनवून शारीरिक, आर्थिक, शैक्षणिक व मानसिकदृष्ट्या सशक्त करण्यासाठी जयहिंद प्रयनशील आहे. जयहिंद महिला मंचद्वारे युवतींमध्ये संशोधन वृत्तीस प्रोत्साहन देण्यासाठी 'मी एक तारा' मोहिमेद्वारे प्रयत्न करणे, त्यांना शिष्यवृत्ती व तज्ञ शास्त्रज्ञ यांच्याद्वारे प्रशिक्षण देणे असे उपक्रम सुरु आहेत.
युवाशक्ती
सशक्त समाज घडविण्यासाठी युवकांना संघटित करून त्यांना राजकारण, समाजकारण व अर्थकारण यांमध्ये प्रशिक्षित करणे, युवा संवादाद्वारे युवक- युवतींमध्ये जागृती निर्माण करणे व आधुनिक विचारांच्या युवकांची चळवळ निर्माण करणे, हे देखील जयहिंद लोकचळवळीचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
समता व बंधुता
समाजात समता व बंधुता निर्माण करणे, सुसंवादी, सहिष्णू व विवेकी समाज घडविणे हे जयहिंदचे लक्ष्य आहे. त्यासाठी जयहिंद लोकचळवळ प्रबोधन, प्रशिक्षण या माध्यमातून सातत्याने कार्यरत आहे.
न्याय व्यवस्था
नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे व मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी राज्यघटनेनुसार न्यायव्यवस्था चोख असली पाहिजे. समाजासाठी निर्माण केलेल्या कायद्यांचे काटेकोरपणे पालन व्हायलाच हवे. त्यांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी न्यायव्यवस्था सक्षम असणे गरजेचे आहे.
सुदृढ लोकशाही
धर्मनिरपेक्षता ही चांगला समाज व चांगल्या राष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे.परंतु दुर्दैवाने धर्मनिरपेक्षता या शब्दालाच काही अविचारी लोकांनी चुकीचा अर्थ लावून बदनाम केले. त्यामुळे सुदृढ लोकशाहीसाठी समाजात त्याबद्दल जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे.

सुदृढ समाज व्यवस्था सदैव सुदृढ ठेवण्यासाठी

  • धर्म-अध्यात्माचे खरे स्वरूप व महत्त्व जाणून घेऊन त्याप्रमाणे आचरण व सर्वधर्मांप्रती आदरभावना बाळगणे हे सर्व खऱ्या अर्थाने चांगल्या समाजासाठी पूरक आहे.
  • उदारता- 'Love thy neighbour' या उक्तीनुसार समाजातील विविध घटकांवर प्रेम करणे, हा संस्कार जाणीवपूर्वक रुजवणे.
  • चांगल्या नागरिकांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या लहानपणापासून त्यांच्या मनात रुजवणे.
  • शिक्षण- मुल्याधिष्ठित शिक्षणाची अंमलबजावणी करणे.
  • आपल्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारून योग्यरीत्या वर्तणूक करणे.
  • समाजातील विविध उपक्रमांमध्ये कृतीशील राहून सक्रीय सहभाग घेणे.
  • समाजात लोकशाही मूल्ये, समता, बंधुता रुजवण्यासाठी व आपापसांत प्रेम, स्रेह व सहकार्याची भावना वृद्धिंगत करण्यासाठी कटिबद्ध राहणे.

आपले शिक्षण, नोकरी, व्यवसाय सर्व सांभाळून आपणही समाजासाठी भरीव योगदान देऊ शकतो. आपल्या व्यक्तिमत्व विकासासोबत सुदृढ निरोगी कृतिशील समाजाचे स्वप्न पूर्ण करूया.

चला जयहिंद लोकचळवळीच्या कार्यात सहभागी होऊया !